समाजसेवी संस्थांना स्वयंशिस्तीची निकड

Posted by DK on December 20, 2020

 

                                विश्वस्त मंडळ :


संस्था रीतसर स्थापन करणे हे जसे कायद्याने आवश्यक असते, तसेच संस्थेच्या विशिष्ट रचनेमुळे कोणतेही कार्य करण्यात एक प्रकारे सुलभता येते. संस्थेला एक निश्चित चौकट निर्माण करून तिच्या विहित कार्याची लोकाभिमुखता काही प्रमाणात निश्चित करता येते.

संबंधित कार्यासाठी आवश्यक ती संसाधने जोडण्यास याचा फायदा होतो. अशा नोंदणीकृत संस्थांना विश्वस्त मंडळ असणे हे कायद्यानेही अनिवार्य आहे.

विश्वस्त मंडळाकडे संस्थेच्या कारभारासंबंधात अंतिम निर्णय घेण्याची क्षमता असते. संस्थेच्या प्रमुख कारभाऱ्याची नेमणूक व इतर महत्त्वाच्या पदांवरील नेमणुका करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

संस्थेने केलेल्या आर्थिक मागण्या आणि दिलेले हिशोब मंजूर वा नामंजूर करणे, हे विश्वस्त मंडळाच्या जबाबदारीचा एक अविभाज्य भाग आहे. या व अशा अनेक कारणांनी संस्थेला सक्षम विश्वस्त मंडळ  असणे महत्त्वाचे ठरते. परंतु माझ्या अनुभवात विश्वस्त मंडळ ही समाजसेवी मंडळींना थोडी दुखरी बाजू वाटते. विश्वस्त आणि व्यवस्थापन यांतही अनेक नावाजलेल्या संस्थांमध्ये गल्लत होताना दिसते.

त्यामुळे संस्थेसाठी (अल्प का होईना, पण आर्थिक मोबदला घेऊन) कार्य करणारे हेच जर विश्वस्त असतील तर सध्याच्या समाजसेवी संस्थांच्या रचनेमध्ये कार्य अहवाल कोणी कोणाला सादर करावयाचा, आणि कोण कुणाला प्रश्न विचारणार, यांतही गल्लत होते. स्वत:च्या कामकाजाचा अहवाल स्वत:लाच देणे हे कुठल्याच उत्तरदायित्वया  संकल्पनेत बसणारे नाही.

विश्वस्त आणि व्यवस्थापन यांतील ही गल्लत टाळणे ही काही तशी खर्चीक बाब नाही. संस्था करत असलेल्या कार्याची आणि विश्वस्त या संकल्पनेची व्यवस्थित माहिती असलेल्या, परंतु आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात प्रत्यक्ष कार्यात भाग न घेणाऱ्या व्यक्तींची निवड विश्वस्त म्हणून करणे हे संस्थेच्याच हिताचे ठरते.

 विश्वस्त मंडळात महिलांचा सहभाग किमान पुरुषांच्या संख्येइतका असायला काहीच हरकत नसावी. खरं तर प्रत्येक विश्वस्त मंडळात केवळ पुरुषच असण्याची गरज नाही. महिलाही आता अशा कार्यात मागास राहिलेल्या नाहीत. पंचायती राज येऊन आता जवळजवळ ३५ वर्षं झाली आहेत. ज्या महिलांचा जन्म पंचायती राज कायद्यानंतर झाला, त्या महिलांच्या हाती आता राजकारणाची दोरीही आहे. महिलांनीसुद्धा सामाजिक कार्यात पुरुषांच्या बरोबरीने योगदान दिल्याची उदाहरणे आहेत. याची समाजसेवेच्या क्षेत्रातील मंडळींनी जाणीव ठेवून याबाबत कायद्याने सक्ती होण्याआधी स्वत:च आदर्श निर्माण करावा.

 विश्वस्त मंडळावर कोण असावेत याबद्दल अद्याप सरकारकडून काही स्पष्टता नाही, परंतु विश्वस्त मंडळाचे कार्य पाहता आणि सध्याचे त्याबद्दलचे कायदे पाहता विश्वस्त हे संस्थेच्या कार्याबद्दल सरकारला जबाबदार असतात.

(या जबाबदारीचे स्वरूप प्रत्यक्ष उदाहरणावरून वाचकांच्या लक्षात येईल. पुण्यातील एका नामवंत शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयातील विद्यार्थी सहलीसाठी कोकणात गेले असता तिथे समुद्रात पोहताना दुर्दैवाने काही विद्यार्थी बुडाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्या संस्थेच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांना अटक केली गेली. पुढे ते जामिनावर सुटले, ही गोष्ट अलाहिदा.) 

त्यामुळे विश्वस्त मंडळाची जबाबदारी पेलण्यास सक्षम असलेल्या मंडळींनाच अशा मंडळावर घेणे अपेक्षित असते.

         माझ्या माहितीत पुण्यातील एका संशोधन संस्थेमध्ये सदर संस्थेला आर्थिक मदत देणाऱ्या संस्थेने विश्वस्त मंडळावर त्यांच्या किमान एका व्यक्तीची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्या मते, सरकारी पैसा असो वा लोकांकडून गोळा केलेला असो; त्याच्या विनियोगावर अंकुश असणाऱ्या मंडळावर  दात्यांचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. हा तर्क राज्य सरकार आणि स्थानिक सरकारपर्यंत यायची वाट पाहण्यापेक्षा संस्थांनी आपले विश्वस्त मंडळ  खऱ्या अर्थाने पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रातिनिधिक कसे बनेल यासाठी पावले उचलल्यास संस्थांची विश्वासार्हता वाढण्यास मदतच होईल. आजघडीला याची प्रचंड गरज आहे.

 लोकसत्ता टीम | December 20, 2020 12:31 am

प्रवीण महाजन

pravinssqy@gmail.com

Categories:

Related Posts:

  • बिल्डरच्या सहकार्याविना हाऊसिंग सोसायटी बिल्डरच्या सहकार्याविना हाऊसिंग सोसायटी Published: Saturday, February 23, 2013    नंदकुमार रेगे इमारत बांधून पूर्ण झाल्यावर आणि त्यातील कमीत कमी दहा गाळे विकल्यावर बिल्डरने सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन… Read More
  • गृहनिर्माण संस्थेतील ‘गोंधळी’ सभासद गृहनिर्माण संस्थेतील ‘गोंधळी’ सभासद गोंधळी वृत्तीच्या सभासदांना प्रत्येक गोष्टीत नकारात्मक भाव अधिक प्रमाणात दिसून येत असतात. अरविंद चव्हाण | Updated: June 10, 2017 5:13 AM गोंधळी वृत्तीच्या सभासदा… Read More
  • खरे अपराधी कोण? खरे अपराधी कोण? ‘वास्तुरंग’ (१० जून) पुरवणीत अरविंद चव्हाण यांचा ‘गृहनिर्माण संस्थेतील गोंधळी सभासद’ हा लेख वाचला. लोकसत्ता टीम | Updated: July 15, 2017 1:57 AM ‘गोंधळी’ सभासद की समिती? ‘वास्तुरंग’ (१० ज… Read More
  • सहकारी सोसायटीतील असहकार उल्हास देशमुख vasturang@expessindia.com Published: Saturday, December 14, 2013 'सहकारी गृहनिर्माण संस्था' हे नाव केवळ नावापुरतेच मर्यादित ठेवून प्रत्यक्षात सोसायटीतील अनेक लोकांचा अप्रत्यक्ष असहकारच सुरू असतो. त्या… Read More
  • नॉमिनी आणि वारस प्रमाणपत्र नॉमिनी आणि वारस प्रमाणपत्र या लेखात उल्लेख केलेल्या गृहनिर्माण संस्थेने हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा केला आहे, असे , ‘वास्तुरंग’ मधील ‘गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची  खडतर वाटचाल.. एक अनुभव’ हा मंजिरी घैसा… Read More